नवविवाहित जीवन हे भावनांच वावटळ असतं.
उत्साह, कुतूहल, ऊर्जा, निस्सीम प्रेम याने पुरेपूर भरलेलं असत. एकत्र स्वतःच जग निर्माण करण्याच्या भावनेने ते दोघेही झपाटलेले असतात. लग्ना नंतरचा प्रत्येक दिवस नवीन अनुभव घेऊन येतो, कारण ते दोघही आता एकमेकांचा स्वभाव, सवयी आणि स्वप्नांबद्दल अधिक जाणून घेत असतात. लग्नाचे सुरुवातीचे महिने किंवा काळ हास्य, प्रेम, अधूनमधून होणारे गोड मतभेद यांच्या मिश्रणाने व्यापून गेलेले असतात, जे त्या दोघांना अधिक एकमेकांच्या जवळ आणतात. एकत्र वेळ घालवून गोड आठवणी तयार करण्याचा, त्यांच्या भविष्याचा पाया रचण्याचा आणि आयुष्यभराच्या प्रवासासाठी हातात हात घेऊन सुरुवात करण्याचा हा काळ असतो.
मग हळू हळू “संसार” नावाचा खेळ सुरु होतो आणि हेच जोडपं आता प्रतिस्पर्धक होऊ लागतात. काम आणि जबाबदाऱ्यांच्या वावटळीत अडकलेले, एकेकाळचे लव्ह बर्ड्स आता एकमेकांना पाहण्याचा, एकमेकांना वेळ देण्याचा आनंदही गमवू लागतात. पूर्वी नजरेने एकमेकांशी संवाद साधणारे आता शब्दांमधेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.
“आपलं” म्हणता म्हणता “तुझं-माझं” केव्हा सुरु होत हे त्यांच त्यांना कळत नाही.
कारण मनाच्या जागी आता संसारात घुसतो “तो”.
“तो” कोण? याचाच वेध घेणार नाटक म्हणजे, “पाहिले न मी तुला”