निव्वळ एक कथासूत्र म्हणून पाहायचे झाले तर ही गोष्ट आहे एका वयोवृद्ध जोडप्याची आणि यमदूताची. यातील पुरुष रेल्वेमधून निवृत्त झालेला उच्चपदस्थ अधिकारी आह आणि केवळ फॅसिझमच जगाला वाचू शकतो अशा मताचा आहे तर स्त्री ही खूप शिकलेली, वाचन असलेली आणि राजकीय विचारधारांचा अभ्यास असलेली पण व्यवहारात गृहिणी असलेली असली तरी डाव्या विचारांची आहे.
दोघांपैकी एक जण मृत्यू पावला असला तरी ती व्यक्ती नक्की कोण याबद्दल संभ्रम आहे. कारण, मेलेली व्यक्ती आणि यमदूताच्या ऍपवर येणाऱ्या मेलेल्या व्यक्तीचे नाव वेगवेगळे आहे. यातून चालू होतो एक खेळ जो एकाच वेळी हास्यकारक आणि ट्रॅजिक आहे. त्यातून उलगडणारा आशय मग राजकारण, समाजकारण, अस्तित्व आणि मृत्यू अशा अनेक गोष्टींना भिडतो. मानवी जीवनातील निरनिराळ्या घटकांचा वा अवस्थांचा जसे की जीवन-मृत्यू; एकाकीपणाचे दुःख आणि ‘दुसऱ्या’ कोणाबरोबर राहण्यातून येणारी बंधने — सार्त्र त्याच्या एक्झिट या नाटकात म्हणतो त्याप्रमाणे — हेल इज अदर्स; स्वातंत्र्य, त्याचेच ओझे वाटणे आणि पारतंत्र्याची बंधने पण जबाबदारीतून मुक्तता; साधे, सरळ पण मिळमिळीत वाटेल असे जगणे आणि महायुद्धात सहा कोटी माणसे मरत असताना जगण्याचा प्रयत्न करणे कशात नक्की अर्थ असतो आणि कशात तो अधिक असतो.
खूप वर्षे जगलेल्या माणसाला पडणारे प्रश्नही खूप असतात खोल आतले असतात आणि त्यातून जाणवणारी जगण्यातली अटळ अशी असंगती, ऍब्सर्डिटीही अंगावर येणारी असते.
अर्थात सर्व काही बदलते असते आकस्मिक असते आणि अटळ असतो तो मृत्यूच!